*षडयंत्र* आणि आपले *उलगुलान*
मागे दिनांक १४ सप्टेंबर २०२५ ते १६ सप्टेंबर २०२५ दरम्यान ठाणे जिल्ह्यातील शहापूर पासुन आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष श्री लकी भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी हक्क आणि अधिकार यासाठी *उलगुलान मोर्चा* निघाला होता. या मोर्चात दिनांक १६ सप्टेंबर रोजी मी काही आदिवासी बांधवांना सोबत घेऊन या मोर्चात मुलूंड येथे सहभागी झालो होतो. तिथे आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून मोर्चात सहभागी बांधवांसाठी नाश्ता, चहा आणि पाणी याची व्यवस्था केली होती. या दरम्यान काही गोष्टींचा अनुभव आला त्या मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न.
आदिवासी चळवळीचा अगदी स्वातंत्र्य पुर्व काळापासून मागोवा घेतल्यास एक गोष्ट लक्षात येते की, आदिवासी समाजात सामाजिक जागृती होत असताना, विविध प्रकारच्या संस्था, संघटना उभ्या राहिल्या, आपल्या सर्वांमध्ये अस्मिता जागी झाली आहे,संघटने मुळे आत्मविश्वास निर्माण झाला आहे. मी काय करायला पाहिजे हे शल्य सुद्धा बोचु लागले आहे. ही संपूर्ण परिस्थिती आशादायक जरी वाटत असली तरी सुद्धा काही गोष्टी स्पष्ट करुन जातात की, अजुनही आपल्या आदिवासी समाजाची ससेहोलपट चालुच आहे,आणि आपला आदिवासी समाज व्यवस्थेचा बळी ठरत आहे. यासाठी आपणच जबाबदार आहोत. जेंव्हा समाजासाठी एखादा संवेदनशील प्रश्न निर्माण होतो त्यावेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन वैयक्तिक हेवेदावे विसरून सामाजिक हितासाठी, रक्षाणासाठी, अस्मिते साठी कृती करणं गरजेचं आहे. *"इतिहास शिकवतो की, समान शत्रुचा पराभव करण्यासाठी वैचारिक मतभेद असलेले राष्ट्र, दोस्त राष्ट्र म्हणून एकत्र आले आणि लढले सुद्धा."* परंतु आम्ही आदिवासी बांधव इतिहातून जे घ्यायला पाहिजे ते घेत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे *षडयंत्र* ओळखला शिका. आज महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जे जातीचं राजकारण चालले आहे. ते इतकं भयंकर आहे आणि आपल्या आदिवासी समाजासाठी विध्वंसक आहे. *मराठा समाज कुणबीत आरक्षण मागतो, आणि कुणबीत असलेले आदिवासीमध्ये आरक्षण मागतात.* बरं यात मराठा समाजासाठी ओबीसीत आरक्षण मागणारा जरांगे हा धनगर आणि बंजारा समाजातील लोकांना समर्थन देतोय आणि मराठा समाजाला विरोध करणारा सदावर्ते सुद्धा बंजारा समाजाला ST त आरक्षण मिळावे म्हणून समर्थन देतोय. यांमध्ये एक गोष्ट निश्चित लक्षात येते की, सरळ, सरळ कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही पण आदिवासी समाजाचे नुकसान झाले तरी काही फरक पडणार नाही.*कुणीही यावे आणि आपल्याला टपली मारुन जावे.* इथपर्यंत ठिक आहे परंतु आता जर संपूर्ण आदिवासी समाज, संस्कृती, जल, जंगल आणि जमीन नष्टच करुन टाकायचं हे षडयंत्र रचलं जात असेल तर आपण सर्वांनी वैयक्तिक हेवेदावे, मी ह्या संघटनेत काम करतो, त्या संघटनेत काम करतो हे सर्व विसरुन पुन्हा एकदा यासाठी एकत्र प्रती षडयंत्र रचून, *" उलगुलान"* करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडिया वर संघटना म्हणजे काय, संघटने मध्ये आपण काय करायला पाहिजे हे संदेश प्रसारित होतात परंतु आपल्या कृतीतून ते प्रत्यक्ष होताना दिसत नाही.
लकी भाऊंनी जो *"उलगुलान मोर्चा"* काढला होता. तो कुठल्याही राजकीय पक्षाचा नव्हता, किंवा राजकीय हेतू नव्हता, वास्तवातील आदिवासी समाजाची विविध प्रकारे होत असलेली कुचंबना, दुर्दशा आणि आदिवासी हक्क आणि अधिकार यासाठी धारदार ज्वलंत प्रश्न घेऊन या प्रश्नांना वाचा फोडण्या साठी लक्की भाऊ नी *उलगुलान मोर्चा* मंत्रालय येथे नेला आणि व्यवस्थेला आव्हान दिले. *'उलगुलान जारी है, जारी रहेगा "* फक्त आपण सजग रहा.
*जय जोहार! जय आदिवासी!*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा